सोमवार, २२ एप्रिल, २०१९

*संवेदनातंतूंचे जाळे*

📙 *संवेदनातंतूंचे जाळे* 📙
**************************

पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीरात संवेदनातंतूंचे जाळे सर्वत्र पसरलेले असते. मेंदू डोक्यातील कवटीच्या भागात संरक्षित असून तेथून मणक्यामार्फत मज्जारजू जातात. या मज्जारज्जूंपासून सर्व शरीरभर संवेदनातंतुंचे जाळे पसरत जाते. या संवेदनातंतूंची काही प्रमुख वैशिष्ट्ये लक्षात घेतली तर या अत्यंत क्लिष्ट जाळ्याबद्दल बराचसा खुलासा आपोअाप होत जातो.

शरीरातील अन्य प्रकारच्या पेशी सूक्ष्म असतात, परंतु मज्जापेशी खूप मोठ्या असू शकतात. अशा मज्जापेशी संवेदना गोळा करणाऱ्या व आज्ञावाहक अशा दोन प्रकारच्या असतात. प्रत्येक मज्जापेशीपासून मज्जातंतू निघतात. मज्जातंतूंची लांबी खूपच मोठी म्हणजे एक मीटर इतकीही असू शकते. संवेदनाग्राहक मज्जापेशी त्वचेकडून, स्नायुंकडून मिळणाऱ्या संवेदना मज्जातंतूद्वारा मेंदूकडे पाठविण्याचे काम करतात. आज्ञाग्राहक पेशी या संवेदनांप्रमाणे योग्य त्या आज्ञांचे संदेश मज्जातंतूंद्वारे स्नायूंकडे पाठवतात. हे संदेशवहन फक्त एकाच दिशेने होत असते.

मज्जापेशींची शरीरातील संख्या कायम असते. त्यांचे पुनरुत्पादन कोणत्याही पद्धतीने होत नाही. याचा अर्थ काही कारणाने जर काही पेशी मृत झाल्या, तर त्यांचे कार्य तिथेच थांबते. याच कारणाने मज्जाघाताने एखादा अवयव जर दुर्बल झाला, त्याची हालचाल थांबली, तर ती कायमची थांबते. याचप्रमाणे संवेदनाग्राहक मज्जापेशींत काही बिघाड झाला, तर तो परिणाम कायमचा होऊन तेवढ्या भागापुरती बधिरता येते. पहिले उदाहरण म्हणजे मणक्याला झालेल्या अपघातात त्याखालील भागातील अाज्ञावहन थांबते, परिणामी हालचाल थांबते. दुसरे उदाहरण म्हणजे कुष्ठरोगाचे. यात ठराविक भागातील संवेदनावहन थांबते व तो भाग बधिर राहतो; पण हालचाली कायम असतात.

संवेदनाग्रहण व संवेदनावहन करणारे विशिष्ट तंतू विविध वेदनांत फरक करतात. टोचणे, गरम वस्तूमुळे भाजणे, पिळवटणे या वेदनांतील फरक केला जातो. हा फरक व यांतील सूक्ष्म छटा शरीराच्या भागानुसार बदलतात. दोन टाचण्या टोचताहेत की एक, हे अंतरानुसार व शरीराच्या भागानुसार बदलत जाते. काही औषधांचा परिणाम म्हणून संवेदना तात्पुरत्या नष्ट करता येतात; पण गमतीचा भाग म्हणजे कापलेले, टोचलेले समजत नसले, तरी तेथे भाजलेले समजते. काही औषधे मेंदूतील ग्रहणशक्तीच बधिर करून संवेदना ग्रहण करणे थांबवतात. या प्रकारालाच पूर्ण भूल देणे असे आपण म्हणतो. पण अशा पूर्ण भूल दिलेल्या अवस्थेत शरीराच्या स्नायूंना विद्युतलहरींद्वारे संदेश देता येऊन त्यांचे आकुंचन वा प्रसरण होऊ शकते.

शरीरातील सर्व मज्जापेशी विद्युतलहरींद्वारे संदेशग्रहण वा वहन करतात. अर्थातच हे संदेश पाठवले जात असताना विजेच्या तारांना जसे आवरण असते, तसेच आवरण मज्जातंतूंना असते. त्यालाच 'मायलिन शीथ' असे म्हणतात. मज्जातंतूंचा एकत्र जुडगा जरी बांधला, तरी त्या संदेशांच्या बाबतीत 'शॉर्टसर्किट' होत नाही, ते त्यामुळेच.

असे हे संदेश देणारे व घेणारे संवेदनातंतूंचे जाळे साऱ्या शरीरभर पसरलेले असल्यानेच संपूर्ण त्त्वचा हेही पंचेंद्रियांतील एक इंद्रिय मानले गेले आहे.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

19 मे

  .